
न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान शिक्षक पालक मेळावा उत्साहात पार पडला
टाकळीभान | प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान शिक्षक पालक मेळावा उत्साहात पार पडला. रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत आयोजित या कार्यक्रमात पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर चर्चा केली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ घडवून आणण्यासाठी केवळ शिक्षकांनीच नव्हे तर पालकांनीही मुलांच्या अभ्यासाकडे सातत्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा आणि पालक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य असून त्यांची गुणवत्ता निश्चितपणे उंचावेल,असे प्रतिपादन अर्जुन राऊत यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल, टाकळीभान येथे रयत शिक्षण संस्थेच्या रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आयोजित शिक्षक-पालक मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर शाळेचे प्राचार्य आर.एम.शिंदे,पर्यवेक्षकएस.एस.जरे,तसेच प्रा. कार्लस साठे उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात अर्जुन राऊत म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रेम, शिस्त आणि जिव्हाळ्याने शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात या संस्थेविषयी आयुष्यभर आत्मीयता निर्माण होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांसोबत पालकांनीही अभ्यासावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तसेच मुलांना मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम समजावून सांगणे ही आजची काळाची गरज आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.नवीन शाळेत प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीला भीती आणि दडपणाचे वातावरण असते. अशा विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, शिक्षणाची आवड वाढविणे आणि सकारात्मक वातावरण तयार करणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान शिक्षक पालक मेळावा रयत गुरुकुल प्रकल्पाचे प्रमुख संदीप जावळे यांनी प्रस्ताविकात प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. लहान वयापासूनच स्पर्धात्मक वातावरणाची ओळख करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते आणि भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांना ते अधिक सक्षमपणे सामोरे जाऊ शकतात.
आदिनाथ पाचपिंड यांनी पालकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. प्रा. कार्लस साठे यांनी रयत शिक्षण संस्थेची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा अधोरेखित करत नवीन शिक्षकांनीही तीच परंपरा जपावी, असे आवाहन केले. पर्यवेक्षक एस. एस. जरे यांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद आवश्यक असल्याचे सांगितले.
न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान शिक्षक मेळाव्यात पालक सुरेंद्र गायकवाड, विनायक बोरुडे, रमेश कोकणे, मोहन जगताप तसेच उपस्थित माता-पालकांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेत विविध सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदिनाथ पाचपिंड यांनी केले.
खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या शिक्षक-पालक मेळाव्यास पालकांची लक्षणीय उपस्थिती लाभली.













