
श्रीरामपूरात आज भव्य न्याय मोर्चा; दुबैय्या हत्याप्रकरणी ‘मोक्का’ कारवाईची मागणी
श्रीरामपूर | शिव वार्ता प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरातील युवा उद्योजक तथा लक्ष्मीनारायण पॅलेस हॉटेलचे मालक स्व. आकाश शेखर दुबैय्या यांच्या ११ जुलै रोजी दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरात व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वपक्षीयांच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून कडकडीत बेमुदत बंद सुरू आहे.
या आंदोलनाला श्रीरामपूर शहरासह टाकळीभान, बेलापूर आणि परिसरातील गावांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नागरिकांनी बंदला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे.
दुबैय्या कुटुंबाला न्याय मिळावा तसेच आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी श्रीरामपूर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, व्यापारी संघटना व विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत आंदोलन तीव्र केले आहे. लक्ष्मीनारायणचे मालक आकाश दुबैय्या यांची हत्या
याच पार्श्वभूमीवर आज (बुधवार) सकाळी १० वाजता स्टेशन मारुती (हनुमान मंदिर) येथून भव्य न्याय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये संपूर्ण संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची प्रमुख मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या मोर्चात व्यापारी, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, युवक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टीप : ही बातमी आयोजकांकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. प्रशासनाकडून अधिकृत निर्णय अथवा बदल जाहीर झाल्यास त्यानुसार माहिती अद्ययावत करण्यात येईल.













