
टाकळीभान मध्ये श्रीरामपूर–नेवासा रोडची हद्द मोजणी; दोन दिवसांत अतिक्रमण हटविण्याचा इशारा
टाकळीभान प्रतिनिधी :-श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान गावातून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग क्र. ५० म्हणजेच श्रीरामपूर–नेवासा रोड लगत वर्षानुवर्षे झालेल्या अतिक्रमणाविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर कडक पाऊल उचलले आहे. सोमवारी दि. ६ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंची मोजणी करून अधिकृत हद्द निश्चित केली.
या मोजणीदरम्यान पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.दोन दिवसांची अंतिम मुदत सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व अतिक्रमणधारकांना लेखी नोटीस बजावल्या आहेत.
त्यामध्ये दोन दिवसांच्या आत म्हणजेच ८ जुलैपर्यंत स्वखर्चाने अतिक्रमण हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “निर्धारित मुदतीत अतिक्रमण न काढल्यास पोलीस संरक्षणात विभागामार्फत जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
त्यावेळी होणाऱ्या नुकसानाला संबंधित व्यक्ती जबाबदार राहील.”स्वेच्छेने हटवण्यास सुरुवात मोजणी झाल्यानंतर लगेचच अनेक व्यावसायिक आणि रहिवाशांनी स्वेच्छेने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यालगतचे शेड, पायऱ्या, दुकानांपुढील पत्रे मोठ्या प्रमाणात काढण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी अद्यापही पक्के बांधकाम आणि अतिक्रमण शिल्लक आहे. त्यामुळे विभागाने त्या नागरिकांना तातडीने अतिक्रमण हटवण्याचे आवाहन केले आहे.सर्वांसाठी समान नियमांची नागरिकांची मागणीही कारवाई करताना कोणताही भेदभाव होऊ नये अशी मागणी टाकळीभान परिसरातील नागरिकांनी केली आहे. स्थानिक नागरिक म्हणाले, “लहान-मोठा व्यावसायिक असो किंवा राजकीय पाठबळ असलेली व्यक्ती, सर्वांवर समान निकषांनी कारवाई झाली पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होत होता. अपघाताचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे ही कारवाई स्वागतार्ह आहे.”सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील सर्व अतिक्रमणांवर निष्पक्षपणे कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे.













